मी भारतीय सीमेवरील जवान सैनिक बोलतोय - सैनिकांचे मनोगत - Mi Bhartiy Simevaril Javan Sainik Boltoy.
![]() |
मी भारतीय सीमेवरील जवान सैनिक बोलतोय - सैनिकांचे मनोगत |
मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका सैनिकांचे मनोगत किंवा सैनिकांचे आत्मवृत्त बघणार आहोत.
नमस्कार माझे नाव कुलदीप आहे. मी एक भारतीय सैन्य दलातील जवान म्हणजेच सैनिक आहे. आज मी तुम्हा सर्वाना माझी आत्मकथा सांगणार आहे.
आपण सर्वच जण दरवर्षी आपला १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन मोठ्यां उत्साहाने साजरा करतो त्यावेळी आपण खूप जोशाने "भारत माता की जय" असे जयघोष करतो परंतु तुम्ही सर्वांनी कधी विचार केला आहे का की याच आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी दिवसरात्र जे सैनिक भारताच्या सीमेवर उभे राहून न थकता तुमची सुरक्षा करतात त्यांचे जीवन कसे असते ते? आज मी तुम्हाला माझ्या मनोगताद्वारे तेच सांगणार आहे.
माझा जन्म महाराष्ट्रातील एका छोट्याश्या खेड्यात झाला. घरी आई वडील मी आणि लहान भाऊ असे चौघे जण राहतो. माझे वडील सैन्य दलात असल्यामुळे मलाही पहिलापासून सैन्यात भरती होण्याची खूप इच्छा होती. ज्यावेळी माझ्या बरोबरीची मुले शिक्षण पूर्ण करून डॉक्टर, इंजिनियर, वकील, बँक मॅनेजर बनण्याची स्वप्ने बघत होते त्यावेळी मी मात्र देशासाठी लढ्याची स्वप्ने बघत असे. माझे ध्येय पक्के ठरलेले होते आणि त्यामधून मी कधीच स्वतःला विचलित होऊ दिले नाही.
वडिलांच्या सानिध्यात तसा खुप कमी वेळ मिळायचा कारण ते वर्षातून एक किंवा दोन वेळेसच घरी यायचे. पण जेव्हा पण ते सुट्टीवर घरी येत असत त्यावेळी ते नेहमी आम्हाला सैन्यातील लढाईच्या वेगवेगळ्या थरारक घटना सांगत असत. त्यांच्या त्या गोष्टीमधून मला ही सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरणा मिळाली आणि माझे शिक्षण पूर्ण करून मी सैन्यभरतीच्या परीक्षेसाठी पूर्ण मेहनतिनीशी तयारी करू लागलो.
दिवसांमागून दिवस निघून गेले आणि सैन्यभरतीच्या परीक्षेचा दिवस उजाडला. मी संपूर्ण प्रयत्नांनी सर्व कसरती केल्या आणि काही दिवसातच मी सैन्यात दाखल झालो. तो दिवस माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी खुप आनंदाचा दिवस होता.
सैन्यात दाखल झाल्यानंतर माझ्या मेहनतीची खरी कसोटी सूरू झाली. सैन्यातील सरावात मला अफाट मेहनत करावी लागली. बंदूक चालविण्याचे प्रशिक्षणही मी यशस्वीरित्या पूर्ण केले. वना - जंगलातून, काट्याकुडूपातून, थंडीवाऱ्यातून व पावसापाण्यातून कोणत्याही परिस्थितीतून स्वतःच्या बचाव कसा करावा याचेही प्रशिक्षण मी घेतले आणि अखेर मी भारतीय सैन्यात भारत मातेच्या सेवेसाठी खूप गर्वाने तैनात झालो.
मी एक सैनिक जवान आहे आणि माझ्या देशाचे रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावरच आहे हे मी एक क्षणही विसरत नाही. आज मला सैन्य दलात दाखल होऊन जवळपास सात ते आठ वर्षे झाली आहेत या दरमन्यानच्या काळात कित्येक वेळा शत्रूच्या लहानमोठ्या कुरापतीतील लढायांमध्ये मी हजर होतो आणि प्रत्येक वेळी माझ्या इतर सैनिक जवान साथीदारांबरोबर मी संपूर्ण ताकतीनिशी शत्रूला हरवून टाकले आहे. गेल्याच वेळेस शत्रूची गोळी माझ्या पायाला घासून गेली. थोडीशी दुखापत झाली ही होती परंतु काही दिवस विश्रांती घेऊन मी पुन्हा आपल्या नव्या जोशाने कर्तव्यपुरतीसाठी देशाच्या सेवेत हजर झालो आहे.
माझ्या या सैन्यातील नोकरीमध्ये मी कित्येक महिने माझ्या घरी सुट्टीवर जाऊ शकत नाही. कुटुंबातील व्यक्तींचे कित्येक महिने चेहरे दिसत नाही. मला माझ्या आईची आठवण ही येते परंतु माझे पहिले कर्तव्य माझ्या भारत मातेची सेवा करणे हेच आहे असे मी मनात पक्के केले आहे. ना कधी होळी ना कधी दिवाळी हे कोणतेच सण मला घरी जाऊन साजरे करता येत नाहीत. घरचे मात्र प्रत्येक वेळी यावेळी तरी सणाला मी घरी जाईन असे म्हणत सतत माझी वाट बघत असतात.
आम्हा सैनिकांची होळी असो किंवा दिवाळी असो सर्वच येथे सीमेवर असते. पण एक गोष्ट तुम्हा सर्वाना सांगताना मला खूप आनंद होतो की प्रत्येक रक्षाबंधनाला शाळेतील छोट्या छोट्या मुली जेव्हा आमच्या बहीणी बनुन आम्हाला स्वतःच्या हाताने बनविलेल्या राख्या पाठवितात त्या बघून खरंच खूप आनंद होतो. त्या राख्यांबरोबर आमच्यासाठी आलेल्या चिठ्यामधील मचकूर वाचून देशाला आमच्याबद्दल असलेला अभिमान आणि गर्व याची आम्हाला जाणीव होते आणि माझे डोळे पाणावतात आणि देश रक्षणाकारिता आपल्या कर्तव्यपुरतीची ही जाणीव मला आणि माझ्या इतर साथीदारांना अजून प्रेरणा देऊन जाते.
वर्षातून एकदा किंवा दोनदा जेव्हा मी सुट्टीवर माझ्या गावी घरी जातो तेव्हा मनसोक्त माझ्या मित्रांना भेटतो, माझ्या आईच्या हातचे मला आवडणारे पदार्थ खातो, माझ्या गावाकडील निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतो, आणि विशेष म्हणजेच माझ्या गावातील मुलांना देशासाठी आपले कर्तव्य समजावून सांगतो त्यांना सैन्यात दाखल होण्यासाठी प्रोत्साहीत करतो आणि मार्गदर्शन ही करतो आणि जेव्हा सुट्टी संपवून पुन्हा सीमेवर जाण्याची वेळ येते तेव्हा पुन्हा नव्या जोशाने आपल्या भारत मातेच्या रक्षणकारिता शत्रूशी लढण्यासाठी तयार होतो.
शेवटी एकच सांगेन की , मित्रांनो! सीमेवर लढताना आम्हा सैनिकांना कधीच संपूर्ण खात्री नसते की लढाई पूर्ण झाल्यावर पुन्हा आम्ही सगळे सहीसलामत परत येऊ की नाही की शत्रूच्या एखाद्या गोळीचा निशाणा बनू पण एवढे मात्र आम्हा सर्व सैनिकांना माहिती आहे की आज आपला प्रत्येक सैनिक सीमेवर तुमच्या रक्षणकारिता दिवसरात्र पहारा देत उभा आहे म्हणून तुम्ही सगळे निश्चिंतपणे आपापल्या घरी राहू शकता.
तुम्हा सर्वांची खूप मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. म्हणून एक सैनिक म्हणून जरी या भारत मातेसाठी मला कधी शाहिद व्हावे लागले तर मी नक्कीच स्वतःला धन्य मानीन आणि माझे जीवन सार्थकी लागले असेच समजेन.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.